33 Views

*शेतक-याचं स्वप्न !!*
✍️ २४६२

*विनोदकुमार महाजन*

🍇🍇🍇🍇🍇🍇🍇

प्रत्येक शेतक-याचं एक स्वप्न असतं.जवळजवळं एकसारखंच.
विहीर खणायची , बोअर घ्यायच , पाणी करायच अन् बागायती शेती करायची.
बागायतदार शेतकरी व्हायचं.

इकडून तिकडून पैसा पैसा जमा करून ,शासकीय कर्ज घेऊन , कर्जबाजारी होऊन तो बागायतदार होण्याचा प्रयत्न करतो.

कधी द्राक्षबाग लावतो ,कधी केळी ,पपई ,पानमळा ,मोसंबी ,लिंबोणी , असे अनेक प्रयोग करत राहतो.

स्वाभिमानानं जगण्याची अहोरात्र धडपड. पण नशीबी मात्र अहोरात्र उपेक्षा. गरीबी. आर्थिक चणचण.

कसलं जगणंन कसलं काय ?

वाढती मजुरी ,मजुरांची अरेरावी , औषध – खतं यांची महागाई यांना तोंड देत देत , अवकाळी पाऊस , गारपिट , दुष्काळी परिस्थिती यावर मात करत , कसातरी मार्केटला माल पाठवतो.

अन्….??

बेभरवशाच्या शेतीला आणी शेतमालाला व्यापा-यांकडून चांगलाच दणका हाणला जातो.
वर्षभर मरून ,काबाडकष्ट करून ,हाडांची काडे करून सुध्दा म्हणावा तसा भाव शेतमालाला न मिळाल्यामुळे हताश – उदास मनाने घरी परततो.

अन् इकडे व्यापारी मात्र ?
एक दिवसातच दुप्पट नफा कमावतो.
शेतकऱ्यांना वर्ष भर कष्ट करून जे मिळत नाही , ते व्यापारी एक दिवसातच कमाऊन जातो.अन् वर भावही मारतो.
मस्त ऐशोआरामाचं जीवन.

अन् शेतकरी मात्र…कर्म दरीद्री नशीबाचा शेतकरी. दुसरं काय ?
कुठे नोकरी करावी तर शिक्षण ,अनुभव नसतो. व्यावसाय धंदा करावा तर भांडवल नसतं.
कुढतच जगायचं अन् कुढतचं मरायचं. ना हौस ना मौज.
केवळ आशेवर जगायचं.

उद्याचा दिवस चांगला उगवेल…
ही वेडी आशा मनी धरून जगायचं.

आणी महाभयानं दुष्काळ पडला की ,कर्जाच्या डोंगराला कंटाळून ,शरीर एखाद्या झाडाच्या फांदीला लटकवायचं.
अथवा विषारी औषध प्यायचं.
अन् ? नरकयातनेपासून…?? सुटायचं.

मोक्ष ,नरक ,पिशाचयोनी पुढचं कोणी बघितलयं ?
भयंकर जीवनातून मात्र आत्महत्या करून मोकळं व्हायचं.

माझ्या खेडेगावी मी होतो तेंव्हांचा हा एक किस्सा आहे.
मी माझ्या गावात सगळ्यांच्या सुखदु:खात खंबीर साथ द्यायचो , त्यांना मानसिक आधार द्यायचो.त्यामुळे माझा मित्रपरिवार ही मोठा आहे.अगदी आजसुद्धा.
असाच एक गांजलेला शेतकरी मित्र माझ्याकडे यायचा.अन् मनातील सगळं सुखदुःख बोलायचा.एक दिवस त्याने मला आत्महत्येबद्दल सांगितलं.

मी त्याला समजावून सांगितले.
बाबा रे , हमाली कर ,भीक माग.एक दिवस सगळे दिवस पालटतील.पण आत्महत्या करू नको. भूते होऊन फिराव लागतं.

पण एक दिवस खरंच त्यानं आत्महत्या केली.
माझ्या गावी मला अजुनही बरेच मित्र बापू नावाने हाक मारतात.
आत्महत्या केलेला तो मित्र एक दिवस माझ्या स्वप्नात आला.
आणि मला म्हणाला,
” बापू , तु सांगितलेलं खरंच मी ऐकलं नाही. मी खरंच भूत झालो आहे.हे बघ माझे उलटे पाय ! ”
असं म्हणून त्याने मला उलटे पाय दाखवले अन् हळूहळू दिसेनासा झाला.पुन्हा कधीच दिसला नाही.

का ? कोण जाणे ? माहिती नाही. पण माझ्या स्वप्नात , प्रत्यक्षात भूते येऊन माझ्याशी संवाद साधतात. सुखदुःख सांगतात.ब-याच वेळा मोक्ष ही मागतात.
मग ” रामकृष्णहरी ” हा मंत्र म्हणून त्याच्या आज्ञाचक्रावर माझी तर्जनी ( गुरू उंगली ) ठेवली की त्याला मोक्ष मिळतो , असे मी ब-याच वेळा स्वप्नात बघितले आहे.
( कदाचित अतींद्रिय शक्ती कार्य करत असावी.)
असे अनेक अनुभव मला नेहमीच येत असतात.
सगळंचअद्भूत ,अनाकलनीय अविश्वसनीय , आश्चर्यकारक आहे.

असो.
तर पुन्हा शेतकरी मुद्दा.

तरी आता जरा बरं चाललयं म्हणायचं शेतकऱ्यांच्या आयुष्यात.
मोदी राज्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे हळूहळू शेतकरी सुखावतो आहे.शेतकरी राजा नसला तरी कंगाल अवस्थेतून तरी बाहेर पडतो आहे.
हेही नसे थोडके.

*जय हरी विठ्ठल*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!